मुक्या म्हणे...

Monday, August 08, 2011

नीना...२

नीना,
तू अजूनही येतेस माझ्या स्वप्नांत.
घेतेस मला गुरफटून
तुझ्या मऊ सुती पदराच्या
गंधाळलेल्या उबेत.
केसांमधून जाणवतात
तुझी सुरकुतलेली जादुई बोटं.
आणि ऐकू येत मंदमंद
तुझ्या बिनदाताच्या मुखातून
मृदुमुलायम झालेल्या स्वरांचं एक गाणं.
पहाटे कुण्या पक्षाच्या आवाजात
जे विरून जातं कुठेतरी…

सकाळी जागा होतो तेव्हा
मी रात्रभर पांघरलेल्या
तुझ्या त्याच मऊ सुती लुगड्याच्या गोधडीतून
येत असतो तुझा चंदनी गंध.

नीना, त्या चंदनखोडासारखीच तू…
कधी संपलीस… मला कळलंच नाही.


नीना…१

नीना…
एखाद्या परीकथेतली जणू तू.
शुभ्र केसांची नि भुऱ्या डोळ्यांची...
बुढ्ढी के बालवाल्याकडच्या
मिठाईसारखेच तुझे ते केस
आणि तितकाच गोडवा तुझ्यातही.
एखाद्या परीच्या शुभ्र रेशमी चमचम झग्यासारखं
भरजरी नेसलेलं तुझं म्हातारपण.
तितकंच जादुई ते तुझं जगही…

काहीतरी जादू होती खरी तुझ्याकडं…
रात्री झोपताना तू सांगितलेल्या
त्या साऱ्या पऱ्यांच्या गोष्टींचं
स्वप्नांत रूपांतर करणं,
नीना कसं गं जमायचं तुला?
आणि सकाळी जागं करतानाचा
तुझा नितळ दैवी चेहरा बघून
दिवसभर असं वाटायचं
स्वप्न संपलंच नाहिये अजून…

जादू नक्कीच होती तुझ्याकडं…
तुझ्या हातात पडलेली प्रत्येक गोष्ट
जादूचीच जणू होई,
मग ती एखादी साधी पळी असो
वा अगदी बारीक छोटीशी सुई.
शिळ्यापाक्याचीही पक्वान्न करायचीस..
आणि जुन्या साड्यांचे झगे.
पडक्या परसाची करायचीस बाग
अन हरखून जायचे बघे.

पंख तर नक्कीच होते तुझ्याकडं,
कधी कुणाला दिसत नसतील तरी.
कारण पूर्ण दोन पिढ्यांचं अशक्य अंतर
काही क्षणांतच कापून,
अलगद उतरायचीस तू
आमच्या भातुकलीच्या घरात
अगदी आमच्याएवढीच होऊन.

काही अशक्य गोष्टीही जमायच्या तुला,
मी गुडघे फोडून घेतल्यावर
साध्या खोबऱ्याच्या तेलानंही
जखमा भरण्याची जादू होती तुझ्या बोटांत.
त्याच सुरकुतलेल्या बोटांनी पुसायचीस माझे डोळे
आणि साऱ्या अश्रूंचं हसू बनवून
ठेवायचीस नकळत माझ्या ओठांवर.
मग ठेवायचीस माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ,
ज्याचा कधी न संपणारा तुझा डबा
तुझ्या ट्रंकेत अजुनही शोधतोच आहे मी.

तुझ्या गावी दु:खं दिसलीच नाही कधी.
तुला काही दु:खं अशी नव्हतीच का गं?
की ठेवून आली होतीस तीही,
दूर सातासमुद्रापलिकडल्या
अज्ञात बेटावरच्या उंच मनोऱ्यावर,
सात पेट्यांमधल्या बंद पेटीत.
तुझ्या त्या साखरदाण्यांच्या डब्यासारखंच कुठेतरी.

आणि रूपं बदलणंही जमतच होतं ना तुला?
ओव्याअभंगांपासून म्हणीउखाण्यापर्यंत
सारं तोंडपाठ असणारी बहिणाबाई,
गाथापुराणांपासून इतिहासाकथांपर्यंत
सारं सारं सांगणारी  जणू जिजाई,
आजारपणातली माझी सख्खी सोबतीण,
किंवा माझ्या अनेक खोड्यांची रहस्य
गुपचूप दडवून ठेवणारी माझी मैत्रीण...
काहीही अगदी सहजच होऊ शकायचीस तू.
मग त्या माझ्या मैत्रीणीचं रूप घेताघेताच
कधीतरी नानीची 'नीना'ही अशीच झाली असावीस तू.

~~~

नीना,
कधी कधी पावसातून घरी येताना अजूनही वाटतं,
की शुभ्र चमचम केसांच्या परीसारखी दार उघडशील …
भिजलेल्या मला टिपून घेशील
तुझ्या मऊ सुती पदरानं,
आणि ठेवशील माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ.

एवढी एक जादू तुला जमायला हवी होती गं...

Wednesday, October 03, 2007

एक कविता लिहीन म्हणतो...

एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बाराआण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..
शिवारभर ओसंडत त्याच्या नवसाला पावणारी,
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

पुढा-यांच्या डोळ्यांवरती हव्यासाचे पडदे..
धर्मांधांच्या गोळ्यांखाली माणुसकीचे मुडदे..
अमका पक्ष... तमकी सभा,
कापाकापीला पूर्ण मुभा..
दादांना भाईंना मंत्र्याचे छत्र..
हप्तावसुलीला शिफारस-पत्र.
सामान्य माणुस?
बिशाद काय त्याची?
रस्त्यात मेला तरी खातंय का कुत्रं ?
त्याच्या कष्टाचा पडलाय रे भाव.
ऐतखाऊ भ्रष्टांचे शिजताहेत डाव..
कावेबाज लांडग्याचे दिल्लीपर्यंत हात..
फळली नाही दिल्ली तर, साला दुबईको जाव...

मग शतमुखांचा शेष होऊन
खलांच्या टाळूस चावणारी,
हातांमधल्या मशालींतून
क्रांतीची आग लावणारी..
एल्गाराचा घोष बनून
नसानसांतून धावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

Tuesday, September 18, 2007

कोणे एके काळी...

कोणे एके काळी
चमचमत्या पाण्याची एक नदी होती..
आरस्पानी...
तळाशी तिच्या एक गाव होतं...
छोट्या छोट्या जीवांचं... आबादानी..

नदी शांत वाहत राही, सर्वांवरून..
सान-थोर, अमीर फकीर वा भला बुरा असो कोणी..
नि आपल्याच नादात वाहत जाई,
स्वतःचे स्फटीकी आरस्पानी सत्व जाणून
त्या नदीचे चमचम पाणी..

तो प्रत्येक जीव आपापल्या परीनं
तळाशी वेलींना वा खडकांना लटकून राही..
कारण लटकणं हेच होतं जगणं..
आणि प्रत्येक जण शिकून आला होता..
गर्भातूनच,
फक्त प्रवाहात तग धरणं...

पण एक दिवस...
शेवटी म्हणाला एक जण,
'मला या लटकण्याचा वैताग आलाय जाम..
आणि बघू शकत नसलो तरी
माझा विश्वास आहे ठाम...
या प्रवाहात ठाऊक आहे तो जातोय कुठे..
मी झोकून देईन स्वतःला या चमचम पाण्यात..
नि ते घेऊन जाईल मलाही तिथं..
नाहीतर वैतागानेच मरेन रे मी..
असाच जर लटकून राहीलो या इथं'..

मग बाकीचे जीव म्हणाले हसून..
' वेड्या, हाच प्रवाह ज्याचा भक्त आहेस तू..
हा आहे भयाण लाटांचा पूर...
या खडकांवर आदळत आपटत फरपटत,
फेकील तुला अस्सं दूर..
की मग या वैतागापेक्षाही लवकर मरशील तू'...

पण त्यानं ऐकलंच नाही कुणाचं,
आणि लांब एक श्वास घेऊन
त्या चमचम पाण्यामध्ये दिलं स्वतःला झोकून..
वेडा बिचारा त्या प्रवाहाकडून
आदळला आपटला फरपटला गेला...
पण तोही बिलंदर मोठा,
त्यानं पुन्हा लटकायला नकार दिला.

मग प्रवाहानं उचललं त्याला,
मुक्तपणे अलगद तळापासून वर..
अन संपली सारी फरपट..
आदळआपट आणि मरमर..

धारेखालचे ते सारे जीव,
ज्यांना होता नवखा तो, ओरडले,
'अरे बघा हे नवल काय..!!
हा जीव आपल्या सारखाच जरी..
तो उडतो, तरंगतो आहे तरी'..
कुणी म्हणालं,
'मसीहा आहे तो.. आपला तारणहार आहे..
आपल्या सर्वांना तारणार आहे'..

प्रवाहासोबत वाहणारा तो जीव म्हणाला,
'अरे मी कोणी मसीहा नाही..
साधा जीव आहे मी तुमच्याच सारखा..
या नदीला आवडतं
आपल्याला मुक्त उचलून घ्यायला..
पण फक्त थोडं साहस हवं..
या लाटांवर झोकून द्यायला..
हा प्रवासच आहे आपलं काम खरं,
हे साहस म्हणजेच आहे जगणं..
नुसतं लटकणं नाही बरं'...

पण त्यांनी आणखीच घोष केला,
"तारणहार !!...तारणहार !!!..."
त्या वेलींना नि खडकांना लटकत राहीले तसेच,
त्यांनी परत पाहिलं तर तो गेलेला होता..
आणि ते सांगत राहिले मागे,
त्या तारणहाराच्या कथा...

(रिचर्ड बाक च्या 'जोनाथन लिव्हिंगस्टोन सिगल' या पुस्तकातील प्रास्ताविक गद्यकाव्याचा स्वैर अनुवाद.)

Friday, April 13, 2007

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ
अप्राईझल होईल का?
रोजची माझी लेटनाईट
फळाला येईल का?

रोज रोज लीड माझा
खुन्नस देतो भारी..
त्याच्यावरची पोस्ट मिळून
जिरेल का रे सारी....
भोलानाथ भोलानाथ....

दुचाकीची चार चाकी
होईल का रे गाडी..
डब्बल तरी खिशाची या
वाढेल का रे जाडी..
भोलानाथ भोलानाथ....

दरवर्षी जड जाई
अप्राईझलचं नाटक..
आवंदातरी उघडेल का रे
नशिबाचं फाटक...
भोलानाथ भोलानाथ....

Thursday, July 27, 2006

गज़ल – डीजीटल दु:ख..

मी इश्यूंसवे ती रात्र जेव्हा जागली,
मला माझीच कीव याया लागली ।

दु:खे किती डीजीटल नाना परीची,
आय टी त मज भोगाया लागली ।

किती मी त्या लेट्नाईट्स मारल्या,
ती मला ‘ उल्लु ‘ म्हणाया लागली ।

जमले कधी मला न वेळ पाळणे,
बायको लग्नाआधी वैतागली ।

सेन्ड रिसीव्ह करून थकले हात माझे,
सॆलरीची मेल का रागावली ।

पुन्हा पडले स्वप्न जॊब सोडण्याचे,
पुन्हा ती सी.व्ही. बघाया लागली ।

नियतीचा कोड सारा गंडलेला,
नशीबी एरर दिसाया लागली ।

विसरले ते ओठ मुग्ध हासणे,
स्माईली खोटी हसाया लागली ।

मी विसरलो भाषा सर्व बोलण्याच्या,
मित्रहो मज ‘जावा’ कळाया लागली ।

सवय झाली रोज आता जागण्याची ,
दुपारी मज झोप याया लागली ।

इश्यूंमुळे बॊस पुन्हा भडकला,
शिव्यांची मग तोफ त्याने डागली ।

ले ऒफ ची पुन्हा पसरली अफवा,
मंडळी अ॓सेंट चाळाया लागली ।

झाडले चारचौघांत जेव्हा बॊसने,
कंपनी मज ओळखाया लागली ।

स॓लरीची फिगर उमगली जेव्हा,
ती रोज माझ्याशी हसाया लागली ।

एवढी दु;खे पचवली मी ‘मुक्या’ने,
पण आय टी मज जड जाया लागली ।

Thursday, June 01, 2006

पप्या बी साला..

पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..’
गल्लीत यार लई बोर होतं..
दिल्लीच्या राजकारणात शिरायला पायजे.
तोडपानी , हप्तापानी .. साला इन्कमच नाय..
वर्षाकाठी चारपाच घोटाळे करुन
चांगला लंबाचौडा हात मारायला पायजे..

धमक्या द्या, ग्यांग पाठवा,
सालं कुत्रं बी आजकाल खात नाय..
मामालोकांना वाटत बसलो
तर खिशात कायपन –हात नाय..
राव हप्ते मागत बसण्यापेक्षा
आता मतं मागत फिरायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

हिकडं घोडा घेऊन ग्यांग चालवा,
फारतर फार गल्ली डरेल.
तिकडं खादी घालून पक्ष चालवा,
साला आय शी यस वाला बी सलाम करेल..
इथं कट्ट्यावर सडत बसण्यापेक्षा
दिल्लीचा रस्ता धरायला पाहिजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

खरं सांगतो यार तुला,
हिकडं काय पन खरं नाय..
दिवसाकाठी हजार बाराशे
कमाई हाय पन साला ब्यालंस नाय,
सात पिढ्या खातील बसून.
यार येवढा तरी ब्यालंस उरायला पायजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

तू येकच हाक चाळीत टाक
शंभर कार्यकर्ते तयार होतील.
सणावाराला वाढदिवसाला
चौकांत होर्डिंग उभे –हातील.
म्हनून म्हंतो कसा का व्हईना
यंदा पक्ष उभारायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

Monday, March 27, 2006

सती..

त्यादिवशी दवाखान्याबाहेर ब-याच वर्षांनी ती भेटली.
राहती माणसं गेल्यावरती उजाड व्हावं घर तशी
सूनी भकास झालेली..
आणि भिंत भिंत कोसळ्ल्यावर फक्त उरावेत वासे
तशी केवळ सांगाडा राहिलेली.
मनात आलं हीच का ती वेडी पोर ?
नाकात वारं शिरल्या वासरागत सारं शिवार पालथं घालणारी,
कोकरांमागं धावणारी नि पाख्ररांसोबत बोलणारी ?

चेह-यातच कुठेतरी खोल गेलेले तिचे डोळे..
हेच डोळे कधीतरी वर्गात चोरून बघायचे..
फुलपाखरांगत भिरभिरायचे,
कधी लटके रूसून बसायचे, खट्याळ खोड्या करायचे..
त्या डोळ्यांमध्ये आज कुठलीशी उदास धून होती..
अन खपली निघून गेल्यावरही वण तसाच राहावा,
तशी भाळी उरलेली पुसल्या कुंकवाची खूण होती..

चार गोष्टी बोलून झाल्यावर,
आठवणींची दार खोलून झाल्यावर,
म्हणाली,” तोलामोलाचा घरोबा अन भरलं घर पाहून दिलं.
मोठ्या हौसेनं थाटामाटात बापानं लगीन लावून दिलं..
मीही नव-याला देव समजून ठेवला होता पायी जीव..
पापण्यांत हजार स्वप्नं घेऊन ओलांडली होती गावशीव..
पण त्याच देवानं पदरी असा निखा-यांचा भोग दिला.
पहिलीवहिली भेट म्हणून हा विखारी रोग दिला..
पहाडासारखा नवरा माझा पोखरल्या झाडागत मोडून गेला..
या सरणाच्या वाटेवरती मला अशी सोडून गेला.

पहिलीवहिली पोर माझी, जणू अवखळ पाण्याची लाट..
रक्तातूनच घेऊन आली परतीची ती भयाण वाट..
हा रोग म्हणजे टोळधाड, टिकलं नाही एकही झाड.
मग माझी पोर तर इवलं फूल, कसा करील तिचे लाड ?
तरी आल्यासारखी वेडी चार दिवस राहून गेली,
माझ्या कुशीत शहाण्यासारखी चार दिवस पाहून गेली..

आता सासर नाही, माहेर नाही, आपलेपणाचा आहेर नाही.
बंद झालयं हरेक दार..तसे दिवसही राहिलेत चार..
या रांगेत आता औषधासाठी निमूट येऊन उभी राहते.
दिवस दिवस ढकलत राहते मरणाला असं पुढं पुढं..
जिवंतपणे वाहत जाते मीच जणू माझंच मढं..

कुणाला काही सांगताना आता काळीज फाटत नाही.
इतर रोग्यांइतकेच आता याही रांगेत असतात लोक,
म्हणून इथं उभं राहताना आजकाल काही वाटत नाही.
पण याच रांगेत कुल्टाही अन वेश्याही येत असतात पुन्हा पुन्हा..
कुणीतरी सांगेल का की पतिव्रतेचा काय गुन्हा ?
नीतीमत्ता सोडली ज्यानं त्याची ऐसी परिणती..
मग त्याच सरणामध्ये मीही का म्हणून जावं सती..?

- मुकुंद भालेराव..